Friday 20 December 2019

ओमान


एका लेखकाने संगितलेलं एक वाक्य मनात घर करून गेलं, तो म्हणाला की "write the stories you know, just start" या वाक्याला अनुसरुन आणि आईच्या आग्रहाने मी लिहायला लागलो, मला माहिती असलेली खूप जवळची गोष्ट ओमान या बद्दल लिहावे असे सुनील मामा ने सुचवले म्हणून हा प्रयत्न।

Gulf किंवा middle east हे शब्द ऐकले की डोळ्यासमोर येते ते म्हणजे वैभव संपन्न प्रदेश, उंच इमारती, तेलाच्या खाणी आणि हो अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे इस्लामचे उगमस्थान मक्का। या सगळ्यात जे देश अथवा गावं पटकन आठवतात ती म्हणजे दुबई, अबू-धाबी, सौदी अरेबिया आणि अमेरिकेत किंवा युरोपात जाणाऱ्यांसाठी आवडीची विमानसेवा असलेला देश म्हणजे कतार, या पलीकडे जर विचारलं असता फार थोडेच असतील की ज्यांना बाकीचे देश किंवा गावं माहिती असतील। एकूणच इतिहास आणि भूगोल या बद्दल अनासक्त असलेली बहुतांश लोकं आणि प्रसिद्धी पासून लांब राहणाऱ्या ओमानचा मेळ कसा साधला जाईल?

थोडी सद्य परिस्थितिची माहिती, भौगोलिक रित्या ओमान हा अरब देशांमध्ये मोडतो, Gulf Cooperation Council (GCC) चा एक सदस्य देश जिथे राजशाही आहे। ओमानच्या राजाचे नाव सुलतान काबूस बिन सईद अल-बुसैदी असून 1970 साला पासून तो राज्य करत असलेला अलबुसाईदी घराण्यातील चौदावा सुलतान आहे। लोकसंख्येच्या मनाने GCC मध्ये तिसरा तसेच आकाराच्या मनाने दुसरा देश आहे, आपल्या मध्य-प्रदेश किंवा महाराष्ट्रा इतका विस्तार आहे ओमानचा। ओमान मध्ये इस्लामी राजवट आहे पण ओमान चे वेगळेपण असे, की तिथे शिया-सुन्नी असा पंथ भेद नसून ईबाधी इस्लाम नावाची वेगळी पद्धत पाळली जाते। त्यामुळे पंथभेदामुळे उध्वस्त झालेल्या बाकीच्या इस्लामी देशांमध्ये ओमान त्याचे वेगळेपण अजूनही टिकवून आहे।

सहस्त्र वर्षांपासून ओमान आणि भारत (सध्याचा भारतीय उपमहाद्वीप) यांच्यातील नातं अधोरेखित करणारे अनेक पुरावे वाचकांना सापडतील। यात फक्त सांस्कृतिक देवाणघेवाण नाही तर व्यापार आणि मानवी स्थलांतर यांचा खूप मोठा प्रभाव आहे, याचे एक उदाहरण म्हणजे ओमान ला बलुची लोकं प्रामुख्याने मस्कत प्रांतात आहेत, त्यांची मूळ गावं ही आपल्याला सध्याच्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात घेऊन जातात। एक साम्य असे की, जेव्हा पोर्तुगीजांनी गोवा आणि भारताचा पश्चिम किनारा काबीज केला, त्या काळातच ते मस्कत आणि तिथल्या किनाऱ्यावरील काही भाग काबीज करून होते। ओमानचे नशीब भरतापेक्षा बलवत्तर होते कारण त्यांची पोर्तुगीज राजवटीतून सुटका 1650 साली झाली, पण हेच पोर्तुगीज भारताला 1960 पर्यंत पोखरत राहिले आपला छळ करत राहिले। ओमान मुक्त झाले ह्याचे कारण सुलतान इब्न सैफ याच्या नेतृत्वा खाली ओमानी जनतेने पोर्तुगीजां विरुध्द उठाव केला आणि त्यांना सहाय्य मिळाले नरुत्तम नावाच्या एका व्यापाऱ्याचे। पण हे फार काळ टिकले नाही कारण, इराणच्या नादिर शहाने काही दशकातच ओमान काबीज केले, आता यात साम्य असे की हाच नादिर शहा 1739 साली दिल्लीवर चाल करून आला होता। नादिर शहा पासून ओमानची सुटका झाली ती दगा करून, अहमद इब्न सईद च्या नेतृत्वा खाली नादिर शहाच्या सैन्य अधिकाऱ्यांना जेवायला बोलावून त्यांची कत्तल केली गेली। यानंतर मात्र ओमानने भविष्यातल्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी एक कणखर मित्र आपल्या पाठीशी असावा म्हणून इंग्रजांशी मैत्रीचा करार केला।

1804 साली सुरुवात झालेली सुलतान सईदची राजवट हा ओमानी इतिहासातला सोनेरी काळ मानला जातो ज्यात ओमानी नौदलाचे वर्चस्व इंग्रजांच्या मदतीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून (सध्याचा तानझानिया) ते बलुचिस्तान च्या ग्वादर पर्यंत (सध्याचा पाकिस्तान) होते। ह्याचा एक मोठा पुरावा असा की सध्याचे पाकिस्तानसात असलेले ग्वादार पोर्ट ओमान ने 1958 साली पाकिस्तानला विकले। इंग्रजांशी जो मैत्रीचा करार होता त्याच्या सहाय्याने ओमान दोन्ही महायुद्धात स्वतःच्या सीमा अढळ ठेऊ शकले। या सर्व गोष्टी जरी देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असल्या तरी पायाभूत सुखसुविधा ज्या जनसामान्यांसाठी कल्याणकारी ठरल्या असत्या त्याचा अभाव होता। या स्थितीत बदल घडवून आणणारा एक जनकल्याण राजा ज्याला ओमान चे लोकं प्रेमाने "बाबा काबूस" म्हणतात तो सुलतान काबूस बिन सईद अल-बुसैदी याने ओमान चा राज्य कारभार स्वतःच्या हाती घेतला। 23 जुलै 1970 रोजी स्वतःच्या वडीलां विरुध्द (म्हणजे सुलतान सईद बिन तैमुर) इंग्रजांच्या सहाय्याने बंड करून सत्तेवरून हुसकावून लावले व स्वत:ला सुलतान घोषित केले, हे ऐकायला जरी भयंकर वाटत असलं तरी सुलतान काबूसचा या मागचा उद्देश हा जनकल्याणाचा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे।

एकविसाव्या शतकात जिथे माणूस स्वार्थाचे नवनवीन टप्पे ओलांडत आहे, अश्या काळात जनसामान्यांच्या मनात असे वडीलकीचे स्थान निर्माण करणाऱ्याला नक्कीच जनकल्याण राजा म्हणले तर चुकीचे ठरणार नाही। 1970 ला जेव्हा सुलतान काबूस ने राज्य कारभाराला सुरवात केली तेव्हा परिस्थिती अवघड होती। शिक्षणाचा अभाव हा एक प्रमुख प्रश्न होता याचे कारण म्हणजे आधीच्या सुलतानचे शैक्षणिक धोरण, जे थोडे फार शिकलेले ओमानी होते ते देखील परदेशात नोकऱ्या करत होते ज्यामुळे त्यांचा ओमान ला तसा काही उपयोग नाही। एकविसाव्या शतकात अपात्र अश्या पायाभूत सुविधा किंवा त्यांचा पुरता आभाव, जसे की लोकसंख्येच्या मनाने खूप कमी शाळा, जुन्या धाटणीचे बंदर ज्याचा नवीन युगात काही उपयोग नव्हता, वीज ही फक्त मस्कत च्या आसपास, बाकीचा पूर्ण देश अंधारात। या सगळ्या परिस्थितीत बदल घडवून आणायला ओमान ला मदत झाली ती तिथल्या कच्च्या तेलाच्या साठ्यांची। सत्तर च्या दशकात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बरेच प्रकल्प सुरू झाले, या सगळ्यात कच्च्या तेलाच्या विक्रीतून मिळालेला पैसा कामी आला। सुलतानची अजून एक महत्वाची कामगिरी म्हणजे दोफार प्रांताचा प्रश्न सोडवला (तेथील लोकांना बरेच वर्ष अनुभवास आलेली दुय्यम वागणूक आणि त्यातून उद्भवलेली दोफारी लोकांची सशस्त्र क्रांती आणि स्वातंत्र्य चळवळ)। ऐंशीच्या सुरवातीला स्थापित झालेल्या GCC चा एक सदस्य देश बनून ओमान ने स्वतःची जुनी ओळख मागे टाकली आणि आंतरराष्ट्रीय पटलावर एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला। ओमान चे परराष्ट्र धोरण हे अचंबित करण्यासारखे आहे एका बाजूला इराणशी चांगले संबंध तर दुसरीकडे GCC चा एक प्रमुख देश म्हणजे सौदी अरेबियाशी देखील चांगले संबंध, भारत आणि पाकिस्तान या दोघांशी चांगले संबंध, US प्रेसिडेंट ट्रम्प ने वाट लावण्याच्या आधी इराण बरोबर जो आण्विक करार झाला त्याच्या पडद्यामागचा सूत्रधार ओमान होता। सातत्याने लोकांच्या आयुष्यात सुधारणा आणण्याचे काम सुलतान काबूस यांची राजवट करत आली आहे आणि हे काम फक्त मस्कत पुरते नसून छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचलेले आहे।

सौदी अरेबिया मध्ये सध्या बऱ्याच सुधारणा होत आहेत आणि त्याचे कौतुक जगभरात होत आहे, उदाहरण म्हणजे स्त्रियांना वाहन चालवण्यासाठी परवानगी मिळणे, पण ओमान या बाबतीत खूप वर्ष पुढे आहे तेथील महिला नुसते वाहन चालवत नाहीत तर पुरुषांच्या तोडीसतोड देश घडवण्यासाठी कटिबध्द आहेत। कित्येक महिला मोठमोठ्या कंपन्यांच्या उच्च पदावर आरुढ आहेतच, हे त्यांच्या बुद्धीच्या जोरावर कुठल्याश्या आरक्षणाचा आधार घेऊन नाही।

इतके सगळे प्रयत्न करून देखील काम पूर्ण झाले असे नाही म्हणता येणार कारण एखाद्या देशाच्या आयुष्यात 50 वर्षे फार थोडा काळ असतो। या सगळ्या वाटचालीत चुका पण केल्या त्यातली एक मोठी चूक की तेलाच्या साठ्यांवर विसंबून इतर उत्पन्नाचे पर्याय शोधले नाहीत अथवा तयार केले नाहीत, या बाबतीत दुबईने वेळीच ही गोष्ट ओळखून पर्यटन क्षेत्रात खूप प्रगती केली। ओमान ने अजून तरी या बाबींमध्ये हवा तितका विचार केलेला दिसत नाही, गोष्टी बदलत आहेत पण त्याची गती नव्या काळाला अनुसरून नाहीए। करण्यासारखे खूप आहे ओमानला दुबई सारख्या कृत्रिम सौंदर्याची गरज नाही निसर्गाने भरभरुन दिले आहे, त्याला फक्त पायाभूत सुविधांची जोड देणे आवश्यक आहे।

बाबा काबूस नंतर कोण, त्यांनी जे घडवलं ते टिकवणारे तितक्याच ताकदीचे लोकं आहेत की नाही हा प्रश्न, याचे उत्तर सुलतान च्या मंत्र्यांकडे किंवा स्वतः सुलतान कडे असावे इतकीच अपेक्षा करतो। या सगळ्याचा सार म्हणून एक वाक्य जे मला एका ओमानी मित्राने सांगितले ते असे "before Baba Qaboos there was nothing and after he came there was everything" हे पूर्णतः जरी खरे नसले तरी अनुभवातून आलेले हे वाक्य आहे, ज्याला तुम्ही आम्ही खोडून काढू शकत नाही।


धन्यवाद!

No comments:

Post a Comment

The Miss Fit

Today I am again stuck in the memory lane not sure why but then, getting the flashback of all the experiences which somehow made me realize ...